मुंबई
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या 2008 साली झाल्ल्या मालेगाव बॉम्बस्फोट ( Malegaon Bomb Blast) प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर ( Sadhvi Pragya Singh Thakur) यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने निकाल देताना न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं होतं.
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय,यांच्यासह अनेकांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
न्यायालयाने म्हटले की, स्फोटानंतर पंचनामा योग्यरित्या करण्यात आला नाही, घटनास्थळावरून बोटांचे ठसे घेण्यात आले नाहीत. बाईकचा चेसिस नंबर कधीच सापडला नाही, साध्वी त्या बाईकची मालक होती हे सिद्ध होऊ शकले नाही.
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने निकाल दिला. मालेगाव बॉम्बस्फोट झाला हे सरकारी वकिलांनी सिद्ध केले. परंतु मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले. जखमींची संख्या १०१ नाही तर ९५ होती आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली होती, असा निष्कर्ष न्यायालयासमोर आला आहे.
आजपासून सुमारे 17 वर्षांपूर्वी 29 सप्टेंबर 2008 साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रात्रीच्या सुमारासबॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला. त्यामुळेच जखमींची संख्या जास्त होती. घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 30 सप्टेंबर 2008 साली, मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी कलम 307, 302, 326, 324, 427, 153-ए, 120बी, स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी या लोकांचा यामागे हात होता अशी माहिती समोर आली होती. हिंदुत्ववादी विचारसरणीचा भाग म्हणून ही बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आली होती आणि तिची अंमलबजावणी देखील करण्यात आल्याचा आरोप या सर्वांवर होता. एनआयएने सात आरोपींसाठी मृत्युदंडाची मागणी केली होती.
गेल्या 17 वर्षापासून याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुरुवातीला ATS कडे हा तपास होता, नंतर एनआयएकडे हा तपास वर्ग करण्यात आला. एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन देखील मंजूर केला होता. अखेर आज या खटल्याचा निकाल समोर आला आहे.





